१३) क्रोधाला सर्वांत प्रभावी का मानले जाते?

उत्तर – काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे षड्‌रिपू म्हणजेच प्रत्येक मानवाचे पूर्णतेचे स्वप्न साकार न होऊ देणारे सहा शत्रू.

क्रोधामुळे मनुष्य सर्व भान हरवून बसतो आणि मग बर्‍याचवेळा ‘केवळ एका रागाच्या आवेशात घडलेल्या चुकीचे प्रायश्‍चित म्हणून संपूर्ण लौकिक आयुष्य बेचिराख होते.’

मला क्रोध कुणामुळे तरी येत असतो असे आपल्याला प्रत्येकाला वाटत असते, नव्हे तसा आपला ठाम विश्वासच असतो. परंतु क्रोध माझ्या मनात राहतो, वाढत जातो व मग त्याला सोयीचे कारण सापडले की उफाळून प्रगट होतो एवढेच. चुकीचे विचार, चुकीचा आहार, विहार व चुकीच्या अपेक्षा ह्या सर्वांचे खतपाणी मिळून मनातील क्रोध बळकट होत जातो.

क्रोध हा सर्वात प्रभावी व क्षणात होत्याचे नव्हते करणारा भस्मासुरच.

अन्यायाची चीड येणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे. परंतु क्षुल्लक कारणावरून मनातल्या मनात किंवा उघडपणे संतापाने वागणे हे मला स्वत:लाच जास्त घातक असते.मी अतिशय रागावल्यामुळे व राग कमी करण्याचा प्रयत्न न केल्यामुळे शरीरामधील अनेक रासायनिक क्रियांवर त्याचे दुष्परिणाम होतात व ते बराच काळ टिकतात. उच्च रक्तदाब (High Blood Pressure), जठरव्रण (Peptic Ulcer), अम्लपित्त (Acidity), हृदयविकार (Heart Diesease), संधिवात (Arthritis), दमा (Bronchial Asthama) इत्यादि अनेक रोग हे रागाला ‘ओ’ देण्यानेच वाढतात हे आधुनिक वैद्यकशास्त्रही आम्हाला सांगते. क्रोधामुळे महाप्राणाचा मनावर असणारा ताबा क्षीण होतो. अर्थातच माझ्या मनावरील परमेश्वरी अंमल क्रोध सैल करतो. अर्थातच क्रोध माझ्या भक्तिमार्गातील प्रवासाच्याही आड येतो.

Scroll to top