१०) अध्यात्म, आध्यात्मिक जीवान आणि व्यावहारिक जीवन यांची सांगड कशी घालावी?

उत्तर – सन्मार्गाने व्यवहार करत राहणे व असा व्यवहार करता करता अंतर्मन हळूहळू परमेश्वरी मनाच्या प्रवेशासाठी मोकळे करत जाणे म्हणजेच अध्यात्म; व जीवनात अध्यात्म हे अंतिम ध्येय साकार करण्यासाठी देहोपयोगी क्रिया सन्मार्गाने चालविणे हाच व्यवहार.
सत्य, प्रेम व आनंद हीच एकमेव अध्यात्माची त्रिसूत्री आहे तर भक्ती, सेवा आणि संस्कारांचे शुद्धीकरण हीच केवळ अध्यात्माची साधने आहेत. व्यावहारिक जीवन जगताना ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम व वानप्रस्थाश्रम जास्तीत जास्त सन्मार्गाने म्हणजेच धर्माने अर्थ व काम हे पुरुषार्थ मिळवून करणे, हीच आध्यात्मिक जीवनाची पहिली यशस्वी पायरी आहे व अशा प्रकारे प्रपंच करीत असताना सेवा व भक्तीचा अवलंब करून स्वत:चे अधिकाधिक शुद्धीकरण घडवून आणणे, ही अध्यात्माची दुसरी यशस्वी पायरी आहे.
आपल्या जीवनातील प्रत्येक कार्य आपण परमेश्वराकरिता करत आहोत व परमेश्वराला प्रत्येक गोष्ट त्याच क्षणी कळत असते, हे लक्षात ठेवून जगणे म्हणजेच आध्यात्मिक जीवन व हाच मार्ग खरेखुरे समाधान, शांती व नित्यप्रसन्नता देणारा असतो.

Scroll to top